सहकार भारतीच्या संघटनात्मक बांधणीसाठी अखेरपर्यंत डॉ.शशिताई अहिरे यांचे योगदान – सतीश मराठे

0 Comments

सहकार भारतीच्या संघटनात्मक बांधणीसाठी अखेरपर्यंत डॉ.शशिताई अहिरे यांचे योगदान - सतीश मराठे

नाशिक – सहकार भारतीच्या संघटनात्मक बांधणीसाठी अखेरपर्यंत कार्यरत असणार्‍या आणि समाजातील सर्वच घटकांच्या प्रगतीसाठी काम करणार्‍या डॉ. शशिताई अहिरे यांच्या निधनामुळे सर्वांना त्यांची उणीव कायमच जाणवणार आहे, अशी भावना आरबीआय संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केली.
डॉ. अहिरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत ते बोलत होते. ठाणे जनता सहकारी बँक अध्यक्ष शरद गांगल, राज्य सहकारी बँक असोसिएशन अध्यक्ष विश्‍वास ठाकूर, राज्य सहकारी पतसंस्था महासंघ अध्यक्ष काका कोयटे, रा. स्व. संघाचे श्रीकृष्ण घरोटे, सहकार भारती प्रदेश संघटन मंत्री शरद जाधव, डॉ. अहिरे यांच्या कन्या लिना अहिरे, सिन्नर सहायक निबंधक संजय गीते, रिमांड होम सचिव चंदुलाल शहा उपस्थित होते.
मराठे यांनी सांगितले की, बँकेच्या कामाची बैठक असो की, सहकार भारतीचे संघटनात्मक काम तसेच सर्व प्रश्‍न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत आणि देशातील विविध भागात कार्यरत असणार्‍या महिला बँकांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता होती. त्याकाळात डॉ. अहिरे यांनी भरपूर प्रवास केला. याबरोबर सामान्यातल्या सामान्य व्यक्तीबरोबर सहजगत्या त्या जोडल्या जात आणि सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची त्यांची मानसिकता होती. कोणतीही गोष्ट साध्या, सरळ, सोप्या भाषेत मांडण्याची कला त्यांच्यामध्ये होती. सहकार भारतीच्या प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आणि गरजूंना उद्योग व्यवसाय उभारणीत हातभार लावला.
राज्य सहकारी बँक असोसिएशन अध्यक्ष विश्‍वास ठाकुर यांनी सांगितले की, ताईंच्या जाण्याने सर्वांना दु:ख झाले आहे. त्यांनी सहकारी बँकिंग क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे. तसेच नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेची स्थापना करून प्रदीर्घ काळ अध्यक्ष पद भूषविले आणि बँकेला नवी उंची मिळवून दिली. नागरी सहकारी बँक महासंघ, नाशिक जिल्हा बँक असोसिएशन आणि जिल्हा बँक फेडरेशनमधे त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केले आहे. समाजातील विविध घटकांना सहकाराच्या क्षेत्रात सामावून घेत त्यांच्या आर्थिक प्रगतीत हातभार लावला. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न केले.
संघटन मंत्री जाधव यांनी सांगितले की, शशिताई म्हणजे मातृतुल्य व्यक्तिमत्व होते. सहकार क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले रेणुका नागरी सहकारी पतसंस्था आणि रेणुका गृहनिर्माण संस्था त्यांनी सुरू केली. विशेष म्हणजे सहकार क्षेत्राच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केले. वैद्यकीय व्यवसाय हा समाज हितासाठी केला. त्याचप्रमाणे सहकार भारतीच्या कार्यासाठी त्यांनी उल्लेखनीय असे काम केले आहे. पतसंस्था महासंघ अध्यक्ष कोयटे यांनी सांगितले की, डॉ. अहिरे यांच्या जाण्यामुळे पतसंस्था चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे तर राज्य पतसंस्था महासंघ अध्यक्ष अजय ब्रम्हेचा म्हणाले की, त्यांचे नेतृत्व आणि कर्तृत्व मोठे होते. जे काम करायचे आहे, ते पूर्ण करण्याचा त्यांचा दृढ निर्धार असायचा. प्रत्येक कामात त्यांचा समर्पण भाव असायचा. रा.स्व.संघाचे घरोटे म्हणाले की, सर्वांना सांभाळून घेणारे मातृतुल्य व्यक्तिमत्व कायमचे आपल्यातून निघून गेले आहे. त्यांनी विविध क्षेत्रातील कामाचा आदर्श स्वत:च्या कृतीमधून दिला आहे.
ठाणे जनता सहकारी बँक अध्यक्ष शरद गांगल म्हणाले, सहकार असो की बँकिंग तसेच अन्य क्षेत्रात डॉ. अहिरे यांनी कामाचा आदर्श घालून दिला आहे आणि सर्वांना प्रोत्साहन देण्याचे महत्वपूर्ण असे काम केले आहे. महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्ष अश्‍विनी बरिस्ते, चंदूलाल शहा, आयुर्वेद सेवा संघ अध्यक्ष आशुतोष यार्दी यांनी मनोगते व्यक्त केली. गोदावरी सहकारी बँक संचालक वसंतराव खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अहिरे यांच्या कार्याचा आढावा घेणारी मनोगते व्यक्त करण्यात आली.

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

सहकारी बँकांकडे पाहण्याचा रिझर्व्ह बँकेचा दृष्टीकोन सकारात्मक - सतीश मराठे…