Category: Latest News

राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये यापुढे ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ठेवणे आणि नोकरभरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविणे असे दोन महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतले आहेत.

  • “पुढील एक वर्ष सोने घेऊ नका” — पंतप्रधानांच्या आवाहनावर भाष्य

    भारतीय समाजात सोन्याला केवळ दागिना म्हणून नव्हे, तर सुरक्षित गुंतवणूक, प्रतिष्ठा आणि भावनिक जिव्हाळ्याचे प्रतीक मानले जाते. लग्नसमारंभ, सण-उत्सव आणि भविष्यातील सुरक्षितता यासाठी भारतीय कुटुंबे मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात. मात्र देशाचे पंतप्रधान वेळोवेळी “अतिरेकी सोने खरेदी टाळा” असे आवाहन करतात, त्यामागे व्यापक आर्थिक विचार दडलेला आहे.

    भारत जगातील सर्वात मोठ्या सोने आयात करणाऱ्या देशांपैकी एक आहे. मोठ्या प्रमाणावर सोने आयात केल्याने देशाचा परकीय चलनसाठा खर्च होतो आणि व्यापार तूट वाढते. म्हणजेच देशातील पैसा उत्पादनक्षम उद्योग, शेती, रोजगारनिर्मिती किंवा पायाभूत सुविधांकडे न जाता निष्क्रिय स्वरूपात सोन्यात अडकून राहतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या गतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

    पंतप्रधानांचा उद्देश लोकांनी सोने पूर्णपणे सोडावे हा नसून, “बचतीचे विविधीकरण” व्हावे हा आहे. नागरिकांनी शेअर्स, म्युच्युअल फंड, सरकारी रोखे, बँक ठेवी, उद्योग गुंतवणूक किंवा डिजिटल अर्थव्यवस्थेकडेही वळावे, असे सरकारचे मत आहे. यामुळे देशातील पैसा उद्योग आणि विकासकामांसाठी वापरला जाऊ शकतो.

    याच पार्श्वभूमीवर सरकारने “सॉव्हरिन गोल्ड बाँड”, “गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम” यांसारख्या योजना आणल्या. या योजनांमुळे लोकांना सोन्याच्या किमतीचा फायदा मिळतो, पण प्रत्यक्ष सोने आयात करण्याची गरज कमी होते.

    तथापि, भारतीय मानसिकता आणि संस्कृतीत सोन्याचे महत्त्व इतके खोलवर रुजलेले आहे की, “सोने घेऊ नका” हा संदेश पूर्णपणे स्वीकारला जाणे कठीण आहे. ग्रामीण भागात आणि मध्यमवर्गात आजही सोने हेच सर्वात विश्वासार्ह सुरक्षित साधन मानले जाते. त्यामुळे जनजागृतीबरोबरच पर्यायी गुंतवणूक सुरक्षित, सुलभ आणि विश्वासार्ह करणे ही सरकारची मोठी जबाबदारी आहे.

    शेवटी, पंतप्रधानांच्या या आवाहनाचा अर्थ “सोने वाईट आहे” असा नसून, “देशाच्या आर्थिक विकासासाठी बचतीचा काही भाग उत्पादनक्षम क्षेत्रात वळवा” असा आहे. वैयक्तिक सुरक्षितता आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्था यामध्ये संतुलन राखणे, हाच या संदेशाचा मुख्य गाभा आहे….विद्याधर अनास्कर

  • पुनर्विकास करताना कायद्यांचे पालन करत सभासदांचे हित जपले जावे – रणजित नाईकनवरे

    पुणे, दि. ७ – पुनर्विकास करताना आवश्यक सर्व कायद्यांचे पालन करत सभासदांचे हित जपले जाईल आणि त्याचबरोबर शहराचे सौंदर्यही अबाधित राहील याची काळजी घ्यायला हवी, अशी अपेक्षा क्रेडाई इंडियाचे उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे यांनी आज येथे व्यक्त केली. शहराच्या रिअल इस्टेट क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी गृहहार्मनी रिडेव्हलपमेंट स्टेकहोल्डर्स फेडरेशन (GRSF) आणि महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (MNLU) यांच्या संयुक्त विद्यमाने पुनर्विकासावरील दोन दिवसीय विशेष प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिबिर पुण्यात नुकतेच आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन उपस्थित होते.
    महासेवा आणि विकसित कन्सल्टिंग यांच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमात मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. यामध्ये आर्किटेक्ट्स, अनुभवी बांधकाम व्यावसायिक, नवोदित डेव्हलपर्स, कंत्राटदार, विधी तज्ज्ञ, इंजिनिअर्स, सनदी लेखापाल तसेच विविध गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्य यांचा समावेश होता. याप्रसंगी पुनर्विकास प्रक्रियेवर आधारित एका विशेष अभ्यासपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी श्री. नाईकनवरे यांनी रिअल इस्टेट क्षेत्रातील आपले अनुभव सांगतानाच GRSF च्या स्थापनेमागील उद्दिष्टे आणि भविष्यातील ध्येयधोरणांवर प्रकाश टाकला तर सुहास पटवर्धन यांनी पुणे शहरातील पुनर्विकासाचे सद्यस्थितीतील स्वरूप आणि या क्षेत्रापुढील आव्हाने यावर मार्गदर्शन केले. महासेवाचे अध्यक्ष सीए रमेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली हा दोन दिवसीय अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला. यामध्ये पुनर्विकासाच्या विविध पैलूंवर तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले.
    ॲड. धीरज जगदाळे आणि ॲड. गीता चौधरी यांनी गृहनिर्माण संस्थांसाठी आवश्यक असणारी कायदेशीर चौकट आणि पुनर्विकासाची टप्प्याटप्प्याने होणारी प्रक्रिया समजावून सांगितली. आर्किटेक्ट सिराज शेख यांनी युनिफाइड डेव्हलपमेंट कंट्रोल नियमावली आणि स्वयं-पुनर्विकास या संकल्पनेवर तांत्रिक विश्लेषण सादर केले. मंत्रा ग्रुपचे सारांश डे आणि सीए सचिन शर्मा यांनी विकासकाची निवड करताना घ्यावयाची काळजी आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती दिली. सीए ऋषिकेश कोठावळे यांनी पुनर्विकासातील प्राप्तिकर आणि जीएसटी संदर्भातील तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या. ॲड. महेश गजेंद्रगडकर यांनी पुनर्विकासातील तक्रार निवारण आणि कायदेशीर दाद मागण्याच्या पद्धतींवर मार्गदर्शन केले. प्रशिक्षण संचालक विजय सावदेकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले हो