Category: Blog

  • नागरी सहकारी बँकांच्या सहाय्यासाठी स्वतंत्र महामंडळमुंबई, मालेगाव येथे अमित शहांकडून उद्घाटन

    नागरी सहकारी बँकांच्या सहाय्यासाठी स्वतंत्र महामंडळमुंबई, मालेगाव येथे अमित शहांकडून उद्घाटन

    नागरी सहकारी बँकांच्या सहाय्यासाठी स्वतंत्र महामंडळ मुंबई, मालेगाव येथे अमित शहांकडून उद्घाटन.

    मुंबई – आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात सहकार क्षेत्राच्या विस्तारासाठी शिस्त आणि शुचिता आणि संस्थांना समृद्ध करणे यावर अधिक भर देण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या विविध योजना, उपक्रम याचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार असल्याचे केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी येथे संगितले. मुंबईतील कार्यक्रमाबरोबर मालेगाव याठिकाणी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी सहकार क्षेत्र आगामी काळातील योजना तसेच उपक्रम याबाबत सविस्तर विवेचन केले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष सन 2025 च्या प्रारंभानिमित्त येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, नॅफकबचे अध्यक्ष ज्योतिंद्रभाई मेहता व्यासपीठावर होते. यावेळी सहकार वर्षातील कार्यक्रमाची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय शहरी सहकार वित्त आणि विकास महामंडळाच्या मुंबईतील कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सर्वांना एकसमान तंत्रज्ञान मिळावे, तसेच बँकिंग क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी हे महामंडळ काम करणार आहे.

    देशाला आर्थिक शक्ती बनविण्यासाठी सहकार क्षेत्राची महत्त्वाची भूमिका

    भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनविण्यासाठी आणि सन 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचे पंतप्रधान मोदी यांचे ध्येय आहे. यासाठी सहकार क्षेत्राची मोठी भूमिका असणार आहे असे नमूद करून ते म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून देशभरातील सहकार क्षेत्रातील लोक, सहकार मंत्रालय स्थापन करण्याची मागणी करायचे, त्यांचे कोणीही ऐकत नव्हते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर सहकार मंत्रालयाची स्थापना केली आहे. यामुळे देशातील शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. इथे आत्मनिर्भरतेची सर्वात सुंदर कुठली व्याख्या असेल तर ती सहकार आहे, असे ते म्हणाले.

    बँकांची एकछत्री संघटना बळकट करणार

    सरकारने आरबीआय सोबतचे नागरी सहकारी बँकांचे अनेक प्रश्‍न सोडविले आहेत असे नमूद करून ते म्हणाले, नजीकच्या काळात बँकांची एकछत्री संघटना बळकट करून विश्‍वास आणि व्यापार वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. सर्व शेड्यूल्ड सहकारी बँका राष्ट्रीय बँका आणि खासगी बँकांना असणार्‍या सेवा सुविधा पुढील 3 वर्षात सर्व शेड्यूल्ड सहकारी बँकांना देण्यात येणार आहेत. देशात एकूण 1465 नागरी सहकारी बँका असून त्यातील निम्म्या बँका या महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात आहेत. तर एकूण साडे आठ लाखांपेक्षा जास्त सहकारी संस्था देशात कार्यरत आहेत आणि सहकारी संस्थांचे सर्व व्यवहार आणि आर्थिक व्यवहार केवळ सहकारी बँकाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. सर्व राज्यात सहकाराचे तत्त्व लागू करण्यात येणार आहे. तरच सहकार क्षेत्र आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होणार आहे, असे ते म्हणाले.

    पीएसीएसमध्ये व्यावसायिकता आणणार

    देशातील प्रत्येक पंचायतीमध्ये एक पीसीएस स्थापन करण्यात येणार आहे असे स्पष्ट करून ते म्हणाले, पीएसीएसच्या व्यवहार्यतेसाठी आदर्श उपनियम तयार करण्यात आले असून सर्व राज्यांनी ते स्वीकारले आहेत. यामुळे नवीन उपक्रम सुरू करता येणार आहे. पीएसीएसमध्ये व्यावसायिकता आणून सर्व सहकारी क्षेत्राला बळकटी देण्याचा हा प्रयत्न असणार आहे.

    साखर निर्यातीच्या निर्णयाचा फायदा कारखान्यांना

    सहकार मंत्रालयाची स्थापना आणि साखर कारखान्यांच्या कराच्या प्रश्‍नांसारख्या समस्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सोडवल्या आहेत, असे नमूद करून ते म्हणाले, इथेनॉलमुळे साखर कारखान्यांचा नफा वाढला आहे. साखरेला चांगला भाव मिळावा, यासाठी सरकारने 10 लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा राज्यातील साखर कारखान्यांना होणार आहे. सहकारी संस्था अधिक प्रमाणावर विकसित होण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यात प्राथमिक कृषी पतसंस्था, दूध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, नागरी सहकारी बँका, गृहनिर्माण संस्था, खादी ग्रामोद्योग आणि पतपुरवठा करणार्‍या संस्था या सात प्रमुख क्षेत्रांत क्रमवारीनुसार वाटचाल करण्यात येणार आहे. असेही त्यांनी नमूद केले. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’ असा नारा दिला होता असे नमूद करून ते म्हणाले, मात्र आता पंतप्रधान मोदी यांनी ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ असा नारा दिला आहे. यामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवला आहे. सहकार आणि विज्ञान एकत्र आले तर शेती क्षेत्र नक्की फायद्याचे होणार आहे. तसेच सेंद्रिय शेती करणार्‍या शेतकर्‍यांना केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे ते म्हणाले.
    सहकार क्षेत्रातील एखादी संस्था चुकीची वागली तर अन्य संस्थांचे नाव खराब होते असे नमूद करून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, हे टाळण्यासाठी सहकार चळवळीतील संस्थांनी पारदर्शकपणे काम करीत पुढे जाण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयामुळे नजीकच्या काळात देशातील सर्व गावांत सहकार संस्थांचे जाळे अधिक मोठ्या प्रमाणावर विणले जाईल. या सहकार चळवळीत अग्रेसर राहण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रयत्नशील राहील, असे ते म्हणाले.
  • आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्ताने राज्यभरात सहकार दिंडीने उत्साह

    आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्ताने राज्यभरात सहकार दिंडीने उत्साह

    आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्ताने राज्यभरात सहकार दिंडीने उत्साह

    शिर्डी अधिवेशनासाठी मुंबई येथून स्व. धनंजयराव गाडगीळ आणि नागपूर येथून सहकार महर्षी वैकुंठभाई मेहता सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही दिंड्या शिर्डी येथे पोहोचल्या. या दिंड्यांमध्ये सहकार भारतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच त्या त्या जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध जिल्ह्यांमध्ये या सहकार दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
    पुणे – सहकार क्षेत्राची सकारात्मक बाजू जनतेसमोर येणे गरजेचे आहे आणि त्याचा प्रसार आणि प्रचार सर्वत्र होणे अपेक्षित आहे अशी अपेक्षा राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सहकार दिंडीच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. सहकारी पतसंस्थांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी सहकार आयुक्त कार्यालय सर्वतोपरी प्रयत्नशील आहे असे त्यांनी नमूद केले.
    पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विविध जिल्ह्यातून काढण्यात आलेल्या सहकारी दिंड्या पुण्यात दाखल झाल्या. त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. नागपुर, वर्धा, यवतमाळ बुलढाणा, मुंबई, पुणे सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर येथून दिंड्या येथे दाखल झाल्या येथून सर्व दिंड्या शिर्डीकडे मार्गस्थ झाल्या. राज्याचे अतिरिक्त सहकार आयुक्त श्रीकृष्ण वाडेकर, सहकार निवडणूक प्राधिकरण आयुक्त अनिल कवडे, जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मोहिते, बुलढाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
    दि. 8 आणि 9 फेब्रुवारी या कालावधीत शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेसाठी विविध देशांतून सहकारी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यूनोच्या वतीने सन 2025 हे आंतराष्ट्रीय वर्ष म्हणून नुकतेच घोषित करण्यात आले असून त्या निमित्ताने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. दि. 8 रोजी विविध देशातील सहकारी संस्था प्रतिनिधी आणि राज्यातील सहकार क्षेत्रात कार्यरत असणार्‍या निवडक युवक आणि महिला प्रतिनिधींची कार्यशाला होणार आहे. तर दि. 9 रोजी राज्यातील पतसंस्थांच्या प्रतिनिधींचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांना निमंत्रित करण्यात आले आहे. या परिषदेत सहकार क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

    Related Post